काव्यपंक्तींचे रसग्रहण
इयत्ता ९ वी-१० वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदद्ययावत आराखड्यानुसार प्रश्न २ (३) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत ४ गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
- पठित पद्यांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
- दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे :
काव्यपंक्तींचे रसग्रहण कसे करावे ?
(१) आशयसौंदर्य : यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
(२) काव्यसौंदर्य : यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
(३) भाषिक वैशिष्ट्ये : यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती), आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.
रसग्रहण लिहिण्याचा आराखडा (३ परिच्छेदांत उत्तर)
आशयसौंदर्य (१ला परिच्छेद)
काव्यसौंदर्य (२रा परिच्छेद)
दिलेल्या पंक्तींच्या कल्पना, प्रतिमा, भाव
निसर्गदृष्टी / तत्त्वज्ञान / भक्ती / समाजदृष्टी
अलंकार, रस (उदा. भक्तिरस, शांत रस इ.)
पंक्तींतून व्यक्त झालेले विचार
भाषिक वैशिष्ट्ये (३रा परिच्छेद)
भाषाशैली (सोप्पी, सुबोध, ग्रामीण, निवेदनात्मक इ.)
छंद (अभंग, ओवी, मुक्तछंद इ.)
लय, नादमाधुर्य, अंतर्गत यमक
शब्दरचना व कवीची हातोटी
✔️ आशयसौंदर्य – कवितेचा संदेश स्पष्ट.
✔️ काव्यसौंदर्य – पंक्तींना धरून अर्थ, भाव, रस समजावून दिले.
✔️ भाषिक वैशिष्ट्ये – छंद, अलंकार, भाषाशैली योग्य रीतीने लिहिली.
खाली नमुना म्हणून इयत्ता नववी पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्रातील प्रत्येक कवितेतील काही ओळींचे रसग्रहण दिले आहे याप्रमाणे कवितेतील कोणत्याही ओळी दिल्या जातील त्यां ओळींचे रसग्रहण खालीलप्रमाणे करावे.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.
कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.
'महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती। भूषवी तिला महारथी'
आशयसौंदर्य : महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका, असे आवाहन शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दांत केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट हा आशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे.
काव्यसौंदर्य : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात - महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. म्हणजे ही नररत्नांची खाण आहे आणि त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे (स्तुतिगीते) गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. 'या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया' अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. 'महाराष्ट्रास्तव लढण्याचे' आवाहन काळजाला भिडते.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - निरोप.
'धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन !'
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी 'निरोप' या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.
काव्यसौंदर्य : युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते - तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - वनवासी.
'आम्ही डोंगरराजाची
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.'
आशयसौंदर्य :
‘वनवासी’ या कवितेत कवी तुकाराम धांडे यांनी सह्याद्री पर्वत, कळसूबाई परिसर आणि प्रवरा नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांचे जीवन सुंदरपणे दाखवले आहे. या कवितेचा मुख्य विचार असा आहे की, जंगलात आणि डोंगरात राहणारी मुले निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने आणि मोकळेपणाने जीवन जगतात. त्यांच्या साध्या आणि मुक्त जीवनाचे चित्रण या कवितेत केले आहे.
काव्यसौंदर्य :
उपरोक्त ओळींमध्ये वनवासी मुलांचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते खूप सुंदर दाखवले आहे. ही मुले स्वतःला डोंगरराजाची मुले म्हणतात आणि त्या परिसराला आपली आई मानतात. ती नदीशी, वाऱ्याशी, सूर्य-चंद्राशी आणि पक्ष्यांशी जणू मैत्री करतात. त्यांच्या मनात कोणतीही भीती नसते आणि त्यांना नैसर्गिक जीवन खूप आवडते. कवीने त्यांच्या आनंदी आणि स्वच्छंद जीवनाचे सुंदर चित्र उभे केले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये :
सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ही कविता साध्या आणि ग्रामीण भाषेत लिहिलेली आहे, त्यामुळे ती वाचायला सोपी आणि जिवंत वाटते. कवितेत निसर्गाशी संबंधित नवीन आणि सुंदर प्रतिमा वापरल्या आहेत. जसे की – वाऱ्याशी खेळणारी मुले, आभाळ पांघरलेले, सूर्य-चंद्राशी बोलणे इत्यादी. तसेच काही ग्रामीण आणि वेगळे शब्द वापरले आहेत, ज्यामुळे कविता अधिक जिवंत वाटते.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
'कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको!'
आशयसौंदर्य : तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी 'आपुले जगणे... आपुली ओळख!' या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.
काव्यसौंदर्य : कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात- आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत 'फटका' हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला सहज जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एकसंघ , लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
COMMENTS